मित्रांनो, आपल्यासाठी आम्ही एक महत्वाचा अपडेट घेऊन आलो आहे. सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यात “शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2022” मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर, ग्रामपंचायत व खासगी शाळांमधील शिक्षक पदांसाठी दुसऱ्या टप्प्यात भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. चला तर बाबत पूर्ण माहिती बघूया!!
उमेदवारांना आपले प्राधान्यक्रम (पसंतीच्या जागा) तयार करून ते लॉक करता यावेत यासाठी पोर्टलवर शुक्रवारपासून सुविधा सुरू झाली आहे आणि ती २ मे २०२५ पर्यंत खुली राहणार आहे. या टप्प्यात शिक्षक पदे भरताना त्या-त्या शाळांतील रिक्त जागा, इयत्ता, विषय, माध्यम, आरक्षण, परीक्षेत मिळालेले गुण आणि उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम या सर्वांचा एकत्रित विचार करून संगणकीय पद्धतीने निवड केली जाणार आहे. ही TET परीक्षा फेब्रुवारी–मार्च २०२३ मध्ये झाली होती आणि त्यामध्ये २ लाखांहून अधिक उमेदवार सहभागी झाले होते. ज्यांनी वेळेत स्व-प्रमाणपत्र सादर करून मान्यता घेतली आहे, त्यांनाच लॉगिनची सुविधा मिळणार आहे.
लॉगिननंतर उमेदवार “प्राधान्यक्रम तयार करा” या पर्यायातून मुलाखतीसह किंवा मुलाखतीशिवाय अशा दोन्ही पद्धतीने आपली पसंतीक्रमाची यादी तयार करू शकतात. एकदा प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर नंतरच्या क्रमांकांचा विचार केला जाणार नाही, त्यामुळे काळजीपूर्वक आणि नीट विचार करून क्रम ठरवा.
अपात्र ठरण्याची शक्यता
कोणी उमेदवार पवित्र पोर्टलवर चुकीची, खोटी किंवा अपूर्ण माहिती भरत असेल, कागदपत्रात गडबड करत असेल, खोटं प्रमाणपत्र लावत असेल, तर त्याला भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवलं जाईल आणि शिक्षा होऊ शकते, असं शिक्षण विभागाने स्पष्ट केलं आहे.
शिक्षक भरती प्रक्रियेसाठी अत्यावश्यक असलेल्या TAIT मे 2025 च्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यानंतर TET ऑक्टोबर 2025 महिन्यात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (TAIT,TET 2025 Exam Date) त्यामुळे शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची संधी ठरणार आहे. राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत उमेदवारांची गुणवत्ता आणि पात्रता तपासण्यासाठी टीएआयटी व टीईटी या दोन्ही परीक्षा अनिवार्य आहेत. २०१७ नंतर तब्बल सहा वर्षांनी २०२३ मध्ये टीएआयटी परीक्षा घेण्यात आली होती. त्या परीक्षेच्या आधारे ३० हजारांहून अधिक शिक्षकांची भरती करण्यात आली.
आता पुन्हा शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्याच्या अनुषंगाने नवे पात्रता निकष निश्चित करण्यासाठी आणि यादी तयार करण्यासाठी परीक्षा घेणे आवश्यक ठरत आहे. TAIT परीक्षेसाठी परीक्षा यंत्रणेकडून तयारीला वेग देण्यात आला असून, प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या कामालाही सुरवात झाली. मागील वेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ही परीक्षा आयोजित केली होती. यंदाही त्या अनुभवाच्या आधारे परीक्षा आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आहे. साधारणपणे ८ ते १० लाख उमेदवार ही परीक्षा देण्यासाठी अर्ज करतील, अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे, शिक्षक पात्रता परीक्षाही (TET) ऑक्टोबर महिन्यात घेतली जाणार असून, ही परीक्षा प्रामुख्याने प्राथमिक शिक्षक (इयत्ता १ ते ५) आणि उच्च प्राथमिक शिक्षक (इयत्ता ६ ते ८) यांच्या भरतीसाठी आवश्यक आहे.
TET परीक्षा पास असलेल्यांनाच शिक्षक म्हणून पात्र मानले जाते. त्यामुळे दोन्ही परीक्षा उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. शासनाकडून लवकरच या दोन्ही परीक्षांबाबत सविस्तर वेळापत्रक, अधिसूचना व अर्ज प्रक्रियेची माहिती प्रसिद्ध करण्यात येईल, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या गेल्या काही वर्षांत झपाट्याने घटली आहे. परिणामी, मागील १५ वर्षांत तब्बल ७२ हजार शिक्षकांची पदे कमी झाली आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांचे रोजगाराच्या शोधात शहरांकडे स्थलांतर, इंग्रजी माध्यमांकडे वाढता कल, आणि जन्मदरातील घट या कारणांमुळे ही परिस्थिती ओढवली आहे.
सध्या राज्यात २२ हजार खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये कार्यरत आहेत. यामध्ये पूर्वी मंजूर केलेली एकूण शिक्षक पदसंख्या २.९२ लाख होती. मात्र, सध्या केवळ २.२० लाख शिक्षक कार्यरत आहेत.
दुसरीकडे, जिल्हा परिषदेच्या ६२ हजार शाळांमध्ये १८ हजार शिक्षकांची पदे कमी झाली आहेत. सध्या या शाळांमध्ये सुमारे १ कोटी ७० लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या १० पेक्षा कमी आहे, ज्यामुळे सुमारे २ हजार शाळा बंद होण्याच्या उंबरठ्यावर आहेत.
शिक्षकांच्या पदांमध्ये घट होण्यामागची कारणे:
- ग्रामीण भागातून शहरांकडे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर
- ‘हम दो, हमारा एक’ यामुळे कमी झालेला जन्मदर
- शिक्षण व नोकरीच्या शोधात वाढलेले विवाहाचे वय
- इंग्रजी माध्यमाच्या शाळांची वाढती संख्या
- इंग्रजी शिक्षणाबाबत पालकांचा वाढता कल
दरवर्षी सुमारे २०० नवीन खासगी इंग्रजी शाळा उघडल्या जात आहेत, तर मराठी शाळांमधील घटलेली विद्यार्थी संख्या अनेक ठिकाणी शिक्षकांच्या तुकड्यांनाही अप्रभावी ठरत आहे. यातून शिक्षकांची पदे कमी केली जात आहेत, ज्याचा थेट परिणाम शिक्षणाच्या दर्जावर व गुणवत्ता व्यवस्थेवर होत आहे.
पवित्र पोर्टलवर केवळ ११ हजार शिक्षक पदांसाठीच भरती
राज्य सरकारच्या पवित्र पोर्टलवर केवळ ११ हजार शिक्षकांच्या जागांची जाहिरात करण्यात आली आहे. त्यामुळे हजारो बेरोजगार उमेदवारांसमोर संधी कमी झाली आहे.
सध्या शाळांमध्ये केवळ शिक्षकेतर नव्हे, तर शिक्षकांच्या आवश्यक पदांमध्येही कपात करण्यात आली आहे. यामुळे नव्या शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करताना शाळांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मराठी शाळांची ही ढासळती अवस्था शिक्षण विभागासाठी गंभीर इशारा असून, या संकटावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
अनुदानित शाळांची स्थिती
एकूण शाळा : २२,०००
एकूण पदे मंजूर : २.९२ लाख
सध्या कार्यरत पदे : २.२० लाख
१५ वर्षांत कमी झालेली पदे: ७२,०००